*दि ठाणे- पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी युवा नेतृत्व श्री. आकाश बाबाजी पाटील यांची निवड*


ठाणे : दि. ठाणे- पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत “ठाणे तालुका” मतदारसंघातून युवा नेतृत्व श्री. आकाश बाबाजी पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. आज दि. २ जून रोजी छाननी चा दिवस असल्याने त्यांच्या विरुद्ध दुसरा अर्ज न आल्याने त्यांना बिनविरोध विजयी घोषित करणायत आले.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे, संसदरत्न खासदार श्रीकांत जी शिंदे, कल्याण तालुकाप्रमुख गोपाळ जी लांडगे व कल्याण ग्रामीण चे आमदार राजेश जी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने त्यांनी ही निवडणूक लढवली. त्यांच्या निवडीमुळे सहकार क्षेत्रात नव्या पिढीच्या नेतृत्वाला संधी मिळाल्याची भावना व्यक्त होत असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

श्री. आकाश पाटील हे उच्चशिक्षित, अभ्यासू आणि दूरदृष्टी असलेले युवा नेतृत्व म्हणून ओळखले जातात. आधुनिक व्यवस्थापन, वित्तीय नियोजन आणि विकासाभिमुख विचारसरणी यांचा उत्तम समन्वय साधत त्यांनी सामाजिक, व्यावसायिक आणि सहकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. युवकांशी असलेला त्यांचा घनिष्ठ संपर्क, जनसामान्यांच्या प्रश्नांप्रती असलेली संवेदनशीलता आणि विकासासाठीची बांधिलकी यामुळे त्यांना सर्व स्तरांतून मोठा पाठिंबा लाभला.

आकाश पाटील यांचे आजोबा स्व. बाळाराम कान्हा पाटील हे १९८६ पासून ते २००८ पर्यंत बँकेवर संचालक मंडळावर होते. ते ४ वेळा अध्यक्ष होते व आकाश पाटील यांचे वडील श्री. बाबाजी बाळाराम पाटील हे २००८ ते २०२६ पर्यंत संचालक मंडळावर होते. ते दोन वेळा अध्यक्ष होते. आकाश पाटील यांच्या रूपाने पाटील कुटुंबीय ची तिसरी पिढी बँकेच्या राजकारणात सक्रिय झाली आहे.
माजी अध्यक्ष श्री. बाबाजी बाळाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाचा वारसा लाभलेल्या आकाश पाटील यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पारदर्शक कारभार, शेतकरी व सभासद-केंद्रित धोरणे आणि बँकेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ठोस दृष्टीकोन मांडला आहे.

आपल्या निवडीबद्दल बोलताना श्री. आकाश पाटील यांनी सांगितले की, “ही निवड माझ्या वैयक्तिक यशाची नसून ठाणे तालुक्यातील सभासद, शेतकरी, सहकारी संस्था आणि सर्व कार्यकर्त्यांनी दाखविलेल्या विश्वासाचा विजय आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला अधिक सक्षम, आधुनिक, पारदर्शक आणि लोकाभिमुख बनविण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने कार्य करेन. युवा शक्ती, तंत्रज्ञान आणि सहकार यांचा संगम घडवून बँकेच्या प्रगतीस नवी दिशा देण्याचा माझा प्रयत्न राहील.”

त्यांच्या बिनविरोध निवडीमुळे बँकेच्या आगामी कार्यकाळात नाविन्यपूर्ण उपक्रम, डिजिटल बँकिंगचा विस्तार, शेतकरी व ग्रामीण भागासाठी अधिक प्रभावी आर्थिक सेवा तसेच युवकांना सहकार क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

श्री. आकाश बाबाजी पाटील यांच्या बिनविरोध निवडीमुळे ठाणे जिल्ह्यातील सहकार क्षेत्राला नव्या विचारांचे, ऊर्जावान आणि विकासाभिमुख नेतृत्व लाभल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
Shahar Varta News
Shahar Varta News