राष्ट्रवादी अजित पवार गटाला खिंडार युवक अध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी (श.प) मध्ये प्रवेश…


ठाणे -  राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला ठाण्यात जोरदार खिंडार पडले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे युवक अध्यक्ष विरू वाघमारे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी डाॅ.जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांचे नेतृत्व मान्य करीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. दरम्यान, भटकलेले पक्षी पुन्हा आपल्याच घरट्यात परतात; तसेच विरू वाघमारे आणि हेमंत वाणी हे दोघे घरी परतले आहेत. विशेष म्हणजे, विरूला त्याच्या आईनेच परत पाठविले आहे, असे डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. 

राष्ट्रवादी काँग्रेस- अजित पवार गटाचे ठाणे शहर युवक अध्यक्ष विरू वाघमारे हे राष्ट्रवादीच्या विभागणीनंतर अजित पवार गटात गेले होते. तर, हेमंत वाणी यांनीही अजित पवार गटाची वाट धरली होती. मात्र, ठाणे शहरातील राष्ट्रवादी (अजित पवार)चे नेतृत्व कार्यकर्त्यांना योग्य तो सन्मान देत नसल्याचा आरोप करीत युवक अध्यक्ष विरू वाघमारे, सरचिटणीस हेमंत वाणी  यांनी बुधवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करीत डाॅ.जितेंद्र आव्हाड यांना वाढदिवसाची भेट दिली. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि युवक अध्यक्ष तथा गटनेते अभिजीत पवार यांनी या सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. 

 यावेळी , " डाॅ.जितेंद्र आव्हाड हे सर्वसमावेशक नेतृत्व  आहे. शिवाय जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि युवक अध्यक्ष अभिजित पवार हे कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालणारे असल्याने आम्ही स्वगृही परतत आहोत; अखेरीस निजामाच्या तावडीतून सुटका झाली, असे विरू वाघमारे यांनी सांगितले.


Shahar Varta News
Shahar Varta News